२०१४ साली मी लिहिलेला लेख येथे पुन: देत आहे. तो अवश्य वाचावा.
हा लेख लिहिल्यानंतर अनेक रुग्णांच्या बिलांची रक्कम इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळवून देण्यासाठी मी मदत केली. त्या दरम्यान समजलेल्या गोष्टी खालील प्रमाणे
- विमा कंपनीमधे २५% "कारकून" प्रथम दावा अमान्य करण्याचे काम करतात. त्यासाठी थोडेफार पटेल असे कारण शोधणे आणि दावा अमान्य करणे ह्याच्यासाठी त्यांना पगार मिळतो. ५०% रुग्ण हे मान्य करुन स्वत: पैसे भरतात आणि गप्प बसतात.
- उरलेले ५०% रुग्ण विमा कंपनीशी पत्रव्यवहार करतात. त्यांचा दावा काही प्रमाणात मान्य करुन साधारण पणे ५०% रक्कम मान्य करणे आणि ५०% अमान्य करणे हे विमा कंपनीतील थोडे वरिष्ठ असे २५% "एक्झिक्युटिव्ह" करतात. साधारण ५०% रुग्ण मंडळी हे मान्य करतात. थोडक्यात इथपर्यंत फक्त १२.५% परतावा कंपनी कडून दिला जातो.
- एकूण रुग्णांच्या २५% पुन्हा एकदा कंपनीला विनंती पत्र लिहितात. त्यांचा दावा ७५% पर्यंत मान्य करण्यासाठी एक डॉक्टरांची फौज असते. ती वैद्यकीय कारणे दखवून २५% दावा अमान्य करते. निम्मे हे मान्य करतात. इथपर्यंत १२.५% * ७५% = ९.३७५+१२.५= २१.३७५% परतावा दिला जातो.
- यातील उरलेले निम्मे एक खरमरीत पत्र पाठवतात व कोर्टात जाण्याची धमकी देतात. यांचा संपूर्ण दावा मान्य होतो,म्हणजेच फक्त १२.५% रुग्णांना पूर्ण रक्कम मिळते. २१.३७५+१२.५=३३.८७५ किंवा घटकाभर आपण एक त्रितियांश धरु.
- १०० टक्के रुग्णांकडून दरवर्षी प्रिमियम घेताना उत्तम सर्व्हिस ची आश्वासन द्यायचे. त्यातील १०% रुग्ण आजारी पडतात. त्यातील फक्त एक त्रितियांश परतावा द्यायचा हा विमा कंपन्यांचा धंदा आहे.
यातून काढलेला मार्ग हा कॅशलेस विमा आहे परंतू त्यात यापेक्षा जास्त फसवणूक आहे. प्रत्यक्षात विम्याचा करार हा रुग्ण व विमा कंपनीमधील आहे, त्यात रुग्णाल्य कोठेच येत नाही.
समजा रुग्णाचा विमा ३,००,००० आहे, आणि त्याचे बिल २,५०,००० झाले तर रुग्ण आनंदाने त्यावर सही करतो. प्रत्यक्षात विमा कंपनी आणि रुग्णालयाच्या करारानुसार रुग्णालयाला फक्त १,२५,००० दिले जातात. अमेरिकेमधे याची माहिती रुग्णाला देऊन त्याने त्यावर सही केल्यावरच विमा कंपनीला पैसे देतात. त्यामुळे रुग्णाच्या विम्यातील फक्त १,२५,००० कमी होऊन पुढील आजाराला १,७५,००० शिल्ल्क राहतात. आपल्याकडे फक्त ५०,००० उरतात. रुग्ण परत रुग्णालयात आला की त्याच्याकडून रुग्णाल्य वसूली करायला मोकळे..!!
यापेक्षा वाईट म्हणजे रुग्ण पाठवतो असे आमिष दाखवून विमा कंपन्या कमी पैश्यांमधे उपचार करायला रुग्णांना भाग पाडतात. तेव्हड्या पैशात उपचार करण्यास तज्ञ डॉक्टर तयार नसल्यास रुग्णाल्याच्या पेशंटना अन अनुभवी / शिकाऊ / रेसिडेंट डॉक्टरांकडून उपचार दिले जातात. त्यांच्या मासिक पगारात अनेक रुग्णांच्या उपचारांचे पैसे रुग्णालयाला मिळतात. रुग्णाला हे कधीच कळत नाही. अश्या पध्दतीने रुग्णाच्या अज्ञानाचा फायदा घेउन विमा कंपन्या भरपूर लूट करत आहेत.
आय. एम. ए. च्या मेडिकोलीगल सेल चे प्रमुख व मॅरेथॉन पळणारे ७० वर्षीय डॉक्टर तळजाईवर पडले आणि मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले. १,२५,००० बिलाची रक्कम देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ केली. मांडीत बसवलल्या स्क्रूची किंमत जास्त वाटते असे सांगून खरेदी बिल मागितले. रुग्णालयाने एका वेळी १०० स्क्रू खरेदी करतो असे सांगून स्क्रूचे बिल देण्यास नकार दिला. शेवटी रुग्णालयाने त्या बिलाची झेरॉक्स आणि पूर्ण किमतीला १०० ने भागून येणारी किंमत असे वेगळे पत्र दिले. त्यानंतर विमा कंपनीने ७५% पैसे देण्याची तयारी दाखवली. शेवटी विमा कंपनीला ग्राहक न्यायालयात जातो असे सांगीतल्यावर २ तासात पूर्ण रक्कम बॅकेत जमा झाली.
माझे व माझ्या पत्नीचे करोनाचे बिल विमा कंपनीने देण्यास नकार दिला. पत्र पाठवल्यावर फिजिशियनचे पैसे कापून तपासण्यांचे व औषधांचे बिल दिले. डॉक्टर सहसा डॉक्टरांकडून पैसे घेत नाहीत असे कारण दिले. परत खरमरीत पत्र पाठवून डॉक्टरांना दिलेल्या चेकची झेरॉक्स आणि ते पैसे हॉस्पिटलच्या खात्यातून गेल्याची नोंद दाखवली आणि मग पूर्ण पैसे आमच्या खात्यात जमा झाले.
अशी ही साठा उत्तराची विमा कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..!!

