(भाग एक)
Thursday, June 30, 2022
डॉक्टर्स डे निमित्त प्रासंगिक : वैद्यकीय व्यवसायातील चुरस..!!
Monday, November 1, 2021
विमा कंपन्यांचा धंदा
२०१४ साली मी लिहिलेला लेख येथे पुन: देत आहे. तो अवश्य वाचावा.
हा लेख लिहिल्यानंतर अनेक रुग्णांच्या बिलांची रक्कम इन्शुरन्स कंपन्यांकडून मिळवून देण्यासाठी मी मदत केली. त्या दरम्यान समजलेल्या गोष्टी खालील प्रमाणे
- विमा कंपनीमधे २५% "कारकून" प्रथम दावा अमान्य करण्याचे काम करतात. त्यासाठी थोडेफार पटेल असे कारण शोधणे आणि दावा अमान्य करणे ह्याच्यासाठी त्यांना पगार मिळतो. ५०% रुग्ण हे मान्य करुन स्वत: पैसे भरतात आणि गप्प बसतात.
- उरलेले ५०% रुग्ण विमा कंपनीशी पत्रव्यवहार करतात. त्यांचा दावा काही प्रमाणात मान्य करुन साधारण पणे ५०% रक्कम मान्य करणे आणि ५०% अमान्य करणे हे विमा कंपनीतील थोडे वरिष्ठ असे २५% "एक्झिक्युटिव्ह" करतात. साधारण ५०% रुग्ण मंडळी हे मान्य करतात. थोडक्यात इथपर्यंत फक्त १२.५% परतावा कंपनी कडून दिला जातो.
- एकूण रुग्णांच्या २५% पुन्हा एकदा कंपनीला विनंती पत्र लिहितात. त्यांचा दावा ७५% पर्यंत मान्य करण्यासाठी एक डॉक्टरांची फौज असते. ती वैद्यकीय कारणे दखवून २५% दावा अमान्य करते. निम्मे हे मान्य करतात. इथपर्यंत १२.५% * ७५% = ९.३७५+१२.५= २१.३७५% परतावा दिला जातो.
- यातील उरलेले निम्मे एक खरमरीत पत्र पाठवतात व कोर्टात जाण्याची धमकी देतात. यांचा संपूर्ण दावा मान्य होतो,म्हणजेच फक्त १२.५% रुग्णांना पूर्ण रक्कम मिळते. २१.३७५+१२.५=३३.८७५ किंवा घटकाभर आपण एक त्रितियांश धरु.
- १०० टक्के रुग्णांकडून दरवर्षी प्रिमियम घेताना उत्तम सर्व्हिस ची आश्वासन द्यायचे. त्यातील १०% रुग्ण आजारी पडतात. त्यातील फक्त एक त्रितियांश परतावा द्यायचा हा विमा कंपन्यांचा धंदा आहे.
यातून काढलेला मार्ग हा कॅशलेस विमा आहे परंतू त्यात यापेक्षा जास्त फसवणूक आहे. प्रत्यक्षात विम्याचा करार हा रुग्ण व विमा कंपनीमधील आहे, त्यात रुग्णाल्य कोठेच येत नाही.
समजा रुग्णाचा विमा ३,००,००० आहे, आणि त्याचे बिल २,५०,००० झाले तर रुग्ण आनंदाने त्यावर सही करतो. प्रत्यक्षात विमा कंपनी आणि रुग्णालयाच्या करारानुसार रुग्णालयाला फक्त १,२५,००० दिले जातात. अमेरिकेमधे याची माहिती रुग्णाला देऊन त्याने त्यावर सही केल्यावरच विमा कंपनीला पैसे देतात. त्यामुळे रुग्णाच्या विम्यातील फक्त १,२५,००० कमी होऊन पुढील आजाराला १,७५,००० शिल्ल्क राहतात. आपल्याकडे फक्त ५०,००० उरतात. रुग्ण परत रुग्णालयात आला की त्याच्याकडून रुग्णाल्य वसूली करायला मोकळे..!!
यापेक्षा वाईट म्हणजे रुग्ण पाठवतो असे आमिष दाखवून विमा कंपन्या कमी पैश्यांमधे उपचार करायला रुग्णांना भाग पाडतात. तेव्हड्या पैशात उपचार करण्यास तज्ञ डॉक्टर तयार नसल्यास रुग्णाल्याच्या पेशंटना अन अनुभवी / शिकाऊ / रेसिडेंट डॉक्टरांकडून उपचार दिले जातात. त्यांच्या मासिक पगारात अनेक रुग्णांच्या उपचारांचे पैसे रुग्णालयाला मिळतात. रुग्णाला हे कधीच कळत नाही. अश्या पध्दतीने रुग्णाच्या अज्ञानाचा फायदा घेउन विमा कंपन्या भरपूर लूट करत आहेत.
आय. एम. ए. च्या मेडिकोलीगल सेल चे प्रमुख व मॅरेथॉन पळणारे ७० वर्षीय डॉक्टर तळजाईवर पडले आणि मांडीच्या हाडाचे फ्रॅक्चर झाले. १,२५,००० बिलाची रक्कम देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ केली. मांडीत बसवलल्या स्क्रूची किंमत जास्त वाटते असे सांगून खरेदी बिल मागितले. रुग्णालयाने एका वेळी १०० स्क्रू खरेदी करतो असे सांगून स्क्रूचे बिल देण्यास नकार दिला. शेवटी रुग्णालयाने त्या बिलाची झेरॉक्स आणि पूर्ण किमतीला १०० ने भागून येणारी किंमत असे वेगळे पत्र दिले. त्यानंतर विमा कंपनीने ७५% पैसे देण्याची तयारी दाखवली. शेवटी विमा कंपनीला ग्राहक न्यायालयात जातो असे सांगीतल्यावर २ तासात पूर्ण रक्कम बॅकेत जमा झाली.
माझे व माझ्या पत्नीचे करोनाचे बिल विमा कंपनीने देण्यास नकार दिला. पत्र पाठवल्यावर फिजिशियनचे पैसे कापून तपासण्यांचे व औषधांचे बिल दिले. डॉक्टर सहसा डॉक्टरांकडून पैसे घेत नाहीत असे कारण दिले. परत खरमरीत पत्र पाठवून डॉक्टरांना दिलेल्या चेकची झेरॉक्स आणि ते पैसे हॉस्पिटलच्या खात्यातून गेल्याची नोंद दाखवली आणि मग पूर्ण पैसे आमच्या खात्यात जमा झाले.
अशी ही साठा उत्तराची विमा कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण..!!
Tuesday, October 19, 2021
सवाई गंधर्व मोहोत्सवातील व्यवसाय
Wednesday, October 6, 2021
आपली किंमत आपणच ठरवावी हे बरे..!!
काल रात्री एका मित्राच्या ओळखीने एका मुलीने मेसेज केला.. डॉक्टर माझ्या मुलासाठी फिजिओथेरपिस्ट सुचवाल का?
मी लगेच फिजिओथेरपिस्टचा नंबर मेसेज केला.
Tuesday, October 5, 2021
टेलिमेडिसिन साठी संमतीपत्राचे महत्व
टेलिमेडिसिन म्हणजे रुग्णाला डॉक्टरांनी प्रत्यक्ष न तपासता दूर अंतरावरून (दूरध्वनी, व्हॉट्सएप, व्हीडिओ कॉन्फरन्स [दूर-दृक्श्राव्य-परिषद] इत्यांदींचा वापर करुन ) रुग्णाच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे उपचार करणे. यावरुन सहज लक्षात येते ती महत्वाची गोष्ट अशी की रुग्णाला प्रत्यक्ष तपासून जी माहिती कळते ती उपलब्ध नसताना आजाराचे अनुमान बांधून शक्य तितके औषधोपचार देणे तंत्रज्ञानाचा वापर करुन शक्य आहे.
करोनाच्या महामारीच्या काळात जेंव्हा रुग्णांच्या हालचालीवर निर्बंध होते आणि डॉक्टरांना संसर्गापासून वाचवण्यासाठी आवश्यक सामुग्रीचा अभाव होता त्या काळात टेलिमेडिसिनचा वापर करुन अनेक रुग्णांवर उपचार करता आले. इतर वेळी जेंव्हा रुग्णाला डॉक्टरांपर्यंत अथवा डॉक्टरांना रुग्णापर्यंत पोचणे शक्य नसेल तेंव्हा टेलिमेडिसिनची उपयुक्तता निश्चितच आहे.
२००६ साली मी बंगलोरच्या आय. आय. एस. सी. मधे झालेल्या आंतरराष्ट्रीय टेलिमेडिसिन परिषदेत "मल्टिलिंग्वल इंटरफेस फॉर टेलिमेडिसिन एप्लिकेशन्स" हा शोधनिबंध वाचला होता. त्यावेळी सभागृहात बसलेल्या हृदयरोग तज्ञाने लडाख येथील रुग्णाच्या हृदयाची तपासणी करुन दाखवली. त्यासाठी लडाख येथील १२वी पास विद्यार्थ्याने तेथील कलर डॉपलर (सोनोग्राफी) मशीनचा प्रोब रुग्णाच्या छातीवर ठेवला आणि बंगलोरमधील तज्ञाच्या सूचनेनुसार तो डावी, उजवी, वर, खाली हलवून सोनोग्राफी चित्र आमच्या समोरील पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले. अंदमान निकोबार येथील रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी सभागृहातील नेत्ररोगतज्ञाने केली. मोतिबिंदू चे ऑपरेशन करायची गरज असेल तर मात्र रुग्णाला मद्रासला यावे लागेल असे सांगावे लागले कारण शस्त्रक्रिया करणे सध्या तरी अशक्य आहे. कोणी सांगावे काही दिवसांनी "रोबो" च्या सहाय्याने शस्त्रक्रिया सुध्दा करता येइल.
तंत्रज्ञानाची भरारी एव्हडी मोठी असताना खूप डॉक्टर खूप रुग्णांसाठी टेलिमिडिसिन का वापरत नाहीत असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण असे की तंत्रज्ञानातील तृटींमुळे रुग्णाला होणारे संभाव्य धोके. त्याशिवाय २००९ साली सुप्रीम कोर्टाच्या मार्कंड काट्जू आणि आर. एम. लोढा यांच्या खंडपीठाने मार्टिन डिसूझा विरुध्द मोहम्मद अश्फाक या खटल्याच्या निकालात मुद्दा क्रमांक ५४ मधे असे सांगीतले आहे की रुग्णाला प्रत्यक्ष तपासल्याशिवाय सर्वसामान्यपणे औषधोपचाराचे प्रिस्क्रिप्शन देऊ नये. आणिबाणीच्या परिस्थितीशिवाय दूरध्वनीचा वापर करुन रुग्णोपचार करण्याची प्रवृत्ती टाळली पाहिजे. त्यानंतर आलेल्या काही खटल्यांच्या निकालात सुध्दा रुग्ण प्रत्यक्ष न तपासता केलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांना दंड करण्यात आलेला आहे. त्यामुळे रुग्णाचा त्रास कमी करण्यासाठी नंतर काही दिवसांनी कायद्याचा त्रास स्वत:ला करुन घ्यायचा का असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे.
करोना महामारीच्या सुरुवातीला मार्च २०२० मधे भारतीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोग आणि नीती आयोग यांच्या सहकार्याने "टेलिमेडिसिन प्रॅक्टीस गाईडलाईन्स" म्हणजेच टेलिमेडिसिन च्या वापरासंबंधी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. त्यामधे जर रुग्णाने डॉक्टरांना टेलिमेडिसिनचा वापर करुन उपचार देण्याची विनंती केली अश्या उपचारांसाठी रुग्णाची संमती सूचित केली जाईल असे म्हटले आहे. परंतू एक तर या मार्गदर्शक सूचना आहेत, कायदा नव्हे. दुसरे म्हणजे रुग्णाला यातील तांत्रिक बाजूचे ज्ञान असण्याची शक्यता कमी आहे. जर रुग्णाने न्यायालयात खटला लावला तर डॉक्टरच्या बाजूने आरोग्य विभाग उभा राहील का हा मोठा प्रश्न आहे. शिवाय रुग्णाच्या उपचारात काही तृटी राहिल्यास ह्या मार्गदर्शक सूचनासुद्धा जबाबदारी डॉक्टरवरच टाकतात. शंका असेल तर उपचार करुन नयेत असे स्पष्टपणे म्हटले आहे.
रुग्ण दवाखान्यात आला की संमती गृहीत धरली जाते आणि प्रत्यक्ष रुग्ण तपासताना शंका असेल तरी प्राथमिक उपचार करुन काही तपासण्या करायला सांगितल्या जातात. त्यामुळे टेलिमेडिसिन द्वारा रुग्णासंबंधी माहिती घेताना काही तृटी राहिल्यास अथवा काही तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर व रुग्णातील संवादात अडचणी आल्यास शेवटी डॉक्टरांनाच जबाबदार धरले जाणार म्हणून डॉक्टर अश्या प्रकारे उपचार करण्यास फारसे उत्सुक नाहीत. किंबहुना आय. एम. ए. ने सांगीतले की रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे की नाही एव्हडे ठरवण्यासाठी, आणि आधी तपासलेल्या रुग्णाची औषधे चालू ठेवण्यापुरताच टेलिमेडीसिनचा वापर डॉक्टरांनी करावा.
अश्या परिस्थितीत तृटी का राहू शकतात आणि कोणत्या तांत्रिक कारणांमुळे डॉक्टर व रुग्णांमधील संवादात अडचणी निर्माण होऊ शकतात याची माहिती रुग्णांना व डॉक्टरांना झाली, व या कारणांसाठी रुग्ण डॉक्टरांना जबाबदार धरणार नाहीत असे संमतीपत्र रुग्णांनी डॉक्टरांना दिले तर टेलिमेडिसिनचा वापर दैनंदिन जीवनात करता येईल. आपला डॉक्टरांकडे जाण्यायेण्याचा त्रास, बरोबर येणार्या नातेवाईकांचा वेळ, गाडी भाडे अथवा पेट्रोलचा खर्च हे सर्व वाचेल. शिवाय रुणालयातील गर्दीमुळे होणार्या संसर्गाची शक्यता कमी होईल. एक रुग्ण बाहेर जाणे व दुसरा आत येणे यातला वाया जाणारा डॉक्टरांचा वेळ वाचेल. ज्या रुग्णांना तपासायलाच पाहिजे त्यांना जास्त वेळ देता येईल, असे अनेक फायदे होऊ शकणार्या टेलिमेडिसिन साठी संमतीपत्रक देणे आणि घेणे महत्वाचे आहे म्हणून हा लेखन प्रपंच..! सोबत संमतीपत्र कसे असावे याचा मसुदा दिला आहे. तो वाचल्यावर बहुतेक वरील बाबी जास्त स्पष्ट होतील. त्यासंबंधी शंका कृपया विचाराव्यात म्हणजे त्यांची उत्तरे देता येतील, आणि टेलिमेडिसिनचा वापर वाढण्यास मदत होईल.
डॉ. राजीव जोशी
एम . बी. बी. एस. , एम. डी. , एल. एल. बी.
Monday, October 4, 2021
राईड
आजकाल लहान मुलांना रडवू नका, हवं ते द्या असा ट्रेंड आहे कारण आई वडिलांकडे पैसा आहे आणि मुलांसाठी वेळ नाही. त्यामुळे मुलांना "नाही" हा शब्दच माहीत नाही.
Thursday, September 30, 2021
म. ए. सो च्या भावे प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
म. ए. सो च्या भावे प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर रौप्यमोहोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणार्या माजी विद्यार्थी मेळाव्यांपैकी प्रथम मेळावा १९६० ते १९७५ मधे इयत्ता चौथी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दि २६/०९/२०२१ रोजी दुपारी ३ ते ६ या वेळात शाळेच्या आवारात पार पडला. मुख्याध्यापक श्री खिलारे आणि सौ महाजन यांच्या नेतृत्वाखाली शाळेच्या सर्व अध्यापिका, अध्यापक आणि सेवकवर्ग यांनी खूप परिश्रमपूर्वक समारंभाचे आयोजन केल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. अत्यंत कल्पकपणे कार्यक्रमाची चार भागांमधे विभागणी करुन त्या प्र्त्येक भागाचे नियोजन कौशल्याने केल्याबद्दल सर्व संबंधितांचे अभिनंदन.
सर्वप्रथम नाव नोंदणी करतानाच आपण कोव्हिडच्या वातावरणात आहोत याची जाणीव करून देण्यासाठी सॅनिटायझरचे तीर्थ हातावर देऊन त्यानंतर कागदाच्या वेष्टनात गुंडाळलेला पेढा चमच्याने देऊन स्वागत करण्यात आले. नावनोंदणी झाल्यावर जवळच केलेल्या सेल्फी पॉइंटवर एकत्र येऊन एकएका वर्गातील विद्यार्थी ग्रुप फोटो काढण्यात मश्गुल झाले, त्यावेळापुरते काढण्यात आलेले मास्क बाकी सर्व कार्यक्रम भर लावलेले होते..! सेल्फी पॉईंटवर विद्यार्थ्यांचा सह्या घेण्याची कल्पना सुरेख..!!
शाळा भरल्याची घंटा झाल्यावर सर्व विद्यार्थी आपापल्या चौथी उत्तीर्ण वर्षाप्रमाणे रांगांमध्ये उभे राहिले. बाईंनी सांगीतले एक हात से नाप लो.. आणि शाळा सुरु झाली..!! राष्ट्रगीत, प्रतिज्ञा, प्रार्थना झाल्यावर सर्वांना जमिनीवर बसायला सांगितले. येथे वेगळेपण एव्हडेच होतेक की ज्यांना खाली बसणे शक्य नव्हते त्यांच्यासाठी बाजूला खुर्च्या ठेवल्या होत्या. विचारपूर्वक नियोजनाच्या अनेक उदाहरणांपैकी हे एक.
आजचा दिनविशेष होता माजी विद्यार्थ्यांचा मेळावा..!! प्राणायामानंतर मुख्याध्यापकांनी आई वडिलांचे स्मरण करायला सांगीतले आणि आकाशातून अमृत वर्षाव (पाऊस) सुरु झाला. लगेच सर्व विद्यार्थांना सभागृहात जायला सांगून सर्व अध्यापक/ सेवक वर्ग त्वरेने तेथील व्यवस्था करण्यात कार्यरत झाला. ५ मिनिटांमधे सर्व विद्यार्थी स्थानापन्न झाले व कार्यक्रम पुढे सुरु झाला. अडचणींवर मात करणे आणि पुढे वाटचाल करणे हे शाळेने पुन्हा एकदा शिकवले..!!
सौ महाजन बाईंनी सर्व विद्यार्थांना त्यांच्यामागोमाग शाळेच्या घोषणा द्यायला लावल्या आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
१, २, ३, ४, भावेची मुले हुशार..
५, ६, ७, ८, भावेची कॉलर ताठ
९, १०, ११, १२ भावेचा आहे दरारा....
या आरोळ्यांनी सभागृह दुमदुमले..!!
शाळेच्या गेल्या १२५ वर्षांच्या इतिहासाची चित्रफीत भन्नाट झाली आहे. आपल्या शिक्षकांचे फोटो आणि नावे पाहून मन भरुन आले. उपस्थित राहिलेल्या वृध्द शिक्षकांचे स्वागत करण्यासाठी केलेले "एक साथ नमस्ते" सर्वांना ५० वर्षांपूर्वीच्या शाळेत घेऊन गेले...!!
मुख्याध्यापकांनी शाळेच्या पुढील योजनांची माहिती दिली. शाळेची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना.
त्या नंतर दाभणात सुतळी ओवणे आणि म्हणी ओळखण्याच्या स्पर्धा घेण्यात आल्या. २० मिनिटांमधे दोन खेळांचे आयोजन करुन सर्व माजी विद्यार्थ्यांना शाळेत अभ्यासाबरोबरच इतर कौशल्ये कशी विकसित केली जातात याची आठवण करुन दिल्याबद्दल वेदपाठक सरांचे मनापासून धन्यवाद..!!
त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आठवणी सांगायचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात काहींनी पाल्हाळ लावला तर वेळे अभावी काहींनी आठवणी न सांगताच आटोपले त्यामुळे हा कार्यक्रम अजून चांगला करता आला असता एव्हडेच सांगेन. अर्थात यात संयोजकांचा दोष नसून सहभागी विद्यार्थी काळ काम वेगाची गणिते नीट शिकले नाहीत एव्हडेच म्हणावे लागेल. शाळेतील आजी विद्यार्थ्यांनी तयार केलीली भेटकार्डे माजी विद्यार्थ्यांना देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे.
त्या नंतर झालेल्या संस्थेच्या पदाधिकार्यांच्या भाषणांचा वेळ कमी करून विद्यार्थ्यांच्या आठवणींसाठी वेळ वाढवायला हवा. पदाधिकार्यांच्या कामाबद्दल एक पुस्तिका काढून ती सर्वांना दिल्यास जास्त योग्य होईल. आलेल्या विद्यार्थ्यांपैकी समाजोपयोगी कामे करणार्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, त्यांच्या यशाबद्दल सर्वांना माहिती देणे जास्त महत्वाचे आहे. शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केल्यास शाळेसाठी देणगी मिळवण्याचा कार्यक्रमाचा उद्देशही सफल होईल असे मला वाटते.
अर्थात हा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे काही तृटी राहणे स्वाभाविकच आहे. आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. तरीही विद्यार्थ्यांशी संपर्क साधण्यासाठी अजून वेळ दिल्यास जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शाळेला पोचता येईल. पंधरा वर्षांऐवजी ७ ते ८ वर्षांचे विद्यार्थी एका वेळी बोलवावेत. झूम, टीम्स इत्यादींचा वापर करुन परगावी / परदेशी रहात असलेल्या विद्यार्थ्यांना सहभागी करुन घेता येईल. गुगल फॉर्मवर नावे नोंदवलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा नाव नोंदणी करायची गरज नाही. ज्यांनी आपली माहिती गुगल फॉर्मवर भरली नाही त्यांना लिंक पाठवावी म्हणजे शाळेकडे सर्व माहिती एक्सेल शीट मधे उपलब्ध होईल. पुढील मेळाव्यापूर्वी वर्तमान पत्रांमधे बातमी येण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती.
कार्यक्रमाच्या शेवटी आयोजित केलेल्या चहापानादरम्यान मित्रमंडळींशी केलेल्या चर्चेत पुढे आलेले मुद्दे वर दिलेले आहेत. करोना काळातही सुंदर नियोजन करुन यशस्वी मेळावा भरवल्याबद्दल आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन..!!
डॉ राजीव जोशी
