Monday, February 29, 2016

रक्ताचा तुटवडा कृत्रिम आहे काय?

दिनांक १० जून रोजीच्या सकाळ मधे रक्ताच्या बाटलीची किंमत वाढल्याची  बातमी वाचली. २००७ मधील ८५० रुपयांपेक्षा २०१४ मधे रक्ताच्या पिशवीची किंमत जास्त असणे स्वाभाविकच आहे. परंतू महागाईच्या वाढत्या निर्देशांकानुसार रक्ताची किंमत वाढवणे आणि रक्तावरील तपासण्यांसाठी अधिक रक्कमेची अपेक्षा असणे या दोन गोष्टी आक्षेपार्ह वाटतात.

कोणत्याही व्यवसायात, मग तो धर्मादाय असो किंवा बाजार असो, काही खर्च हे अत्यावश्यक असतात. प्रथमत: आस्थापन खर्च, कच्चा माल, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधन सामुग्री, आणि तयार मालाचे विपणन करण्यासाठी लागणारी यंत्रणा आणि मनुष्यबळ यांची बेरीज  केली की जो आकडा येतो तो उत्पादन खर्च. त्यात निरनिराळे कर आणि फायदा मिळवला की विक्रीची किंमत ठरते.

बहुतेक सर्व रक्तपेढ्या धर्मादाय संस्था म्हणून नोंदणी करताना आढळतात. तसेच लागणार्‍या  उपकरणांसाठी रोटरी, लायन्स, जायंटस अश्या सामाजिक संस्थांकडून तसेच सरकारकडून अनुदान मिळवून आपला आस्थपनाचा खर्च मिळवतात. लागणारा कच्चा माल त्यांना रक्तदात्यांकडून मोफतच मिळतो. (कायद्याने रक्तपेढ्यांना रक्त मिळवण्यासाठी पैसे देता येत नाहीत) रक्तदान हे महादान मानून अनेक व्यक्ती वारंवार रक्तदान करतात. आपल्या नातेवाईकाच्या आजारपणात रक्तदान करून, अनेकांनी मदत केलेली असेल. रक्ताची मागणी इतकी जास्त आहे की त्याचे विपणन करण्यासाठी काही खर्च करावा लागत असेल असे मला तरी वाटत नाही.  त्यामुळे रक्तपेढ्यांचा मुख्य खर्च हा रक्तावरील प्रक्रिया करण्यासाठी लागणारी साधनसामुग्री आणि मनुष्यबळ याच्यावरच जास्त होतो. हा खर्च रुग्णाकडून घेणे रक्तपेढ्यांना क्रमप्राप्त आहे याबद्दलही कोणाच्या मनात शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे प्रश्न उरतो तो रक्तपेढ्या सांगतात तो खर्च  कमी आहे, योग्य आहे, का जास्त आहे?

रक्ताची पिशवी, आणि रक्त गोठू नये म्हणून लागणारे रसायन यांची किंमत रुपये ४०० इतकी असते. त्यावर गुप्तरोग, कावीळ आणि एच आय व्ही इत्यादी अत्यावश्यक तपासण्यांची किंमत १००० रुपये असल्याचे रक्तपेढ्या सांगतात. पण खाजगी रक्तपेढ्यांमधे १४०० रुपयांना मिळणारी रक्ताची पिशवी सरकारी रक्तपेढ्यांमधे मात्र १००० रुपायांना कशी मिळू शकते?

इतर जास्तीच्या पण रुग्णाच्या हितासाठी उपयोगी तपासण्यांसाठी येणारा खर्च रुपये १२०० असल्याचेही रक्तपेढ्या सांगतात. पॅथॉलॉजी लॅबोरेटरीमधे सुद्धा या तपासण्या साधारण याच दरात केल्या जातात, आणि त्यापैकी कोणीही धर्मादाय असल्याचा आव आणत नाही.  किंबहुना या लॅबोरेटरीज आस्थापनाचा खर्च स्वत:च करतात आणि त्यातील काही, रुग्ण पाठवणार्‍या वैद्यकीय व्यावसायिकांना कमिशन सुध्दा देतात (विपणन खर्च) आणि तरीही फायदा कमावतातच..!! रक्तगट जुळणीसाठी सरकारी रक्तपेढीत १४० रुपये, तर खाजगी रक्तपेढीत २८० रुपये म्हणजे दुप्प्ट आकार..!! त्यामुळे या तपासण्यांमधे रक्तपेढ्याना नफा होत असावा असे म्हटल्यास वागवे ठरणार नाही.

अश्या रितीने मोफत मिळणारा कच्चा माल रुग्णापर्यंत पोचण्यासाठी १४०० ते २६०० रुपये खर्च करावे लागतात. तसेच या रक्तावर रेडिएशन प्रक्रिया केल्यास रक्तसंक्रमण अधिक सुरक्षित होते त्यासाठी आणखी १००० रुपये खर्च येतो, परंतू ही सुविधा सर्व रक्तपेढ्यांमधे उपलब्ध नाही.

या तपासण्यांसाठी लागणारी रसायने आणि मनुष्यबळ  यांचा खर्च रक्तपेढीच्या उलाढालीवरही अवलंबून असतो. परंतू सर्व रक्तपेढ्यांमधे एकसूत्रता असावी यासाठी सरकारने वरीलप्रमाणे दर ठरवून दिले आहेत. त्यामुळे वरीलप्रमाणे आकार घेण्यास कोणाचीही हरकत नसावी अशीरक्तपेढ्यांची अपेक्षा असते.

परंतू हे मांजराने डोळे मिटून दूध पिण्यासारखे आहे. एक तर जेंव्हा रक्ताची गरज असते त्यावेळी रुग्णाचे नातेवाईक घायकुतीला आलेले असतात. त्यातच दुर्मिळ रक्तगट असेल तर रक्तपेढ्या हात वर करून मोकळ्या होतात आणि नातेवाईकाना त्याच रक्तगटाचा रक्तदाता शोधायला सांगतात. काहीरक्तपेढ्यामधे रक्तदाता मिळवण्यासाठी मदत करणार्‍या व्यक्ती नेमलेल्या असतात ज्या अधिक पैसे घेऊन रक्तदाता मिळवून देतात. रक्तासाठी तोंडाला येईल ती, आणि नातेवाईकांना परवडेल ती किंमत वसूल केली जाते, थोडक्यात रक्ताचा बाजार केला जातो ही वस्तूस्थिती आहे. सरकारी दराची पावती आणि वर रोख रक्कम दिल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांच्या हातात अश्या गैरव्यवहारांचा पुरावा रहात नाही, आणि त्या वेळी गरज इतकी तीव्र असते की भ्रष्टाचाराकडे काणाडोळा करावाच लागतो नाहीतर मृत्यूशी गाठ असते. एक डॉक्टर असूनही  माझ्या नातेवाईकांच्या आजारपणात असे पैसे दिलेले आहेत.

रक्तपेढ्या संपूर्णपणे धंदेवाईकच आहेत ह्या माझ्या विधानाला पुष्टी देण्यासाठी, गरजेच्या वेळी रक्तदाता लवकर उपलब्ध व्हावा यासाठी मी स्वत: केलेले प्रयत्न आणि पुण्यातील रक्तपेढ्यांचा संघटनेने एकत्रितपणे त्यांना केलेला विरोध यांची  माहीती पुढे देत आहे.

माझ्या अनेक मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या शस्त्रक्रियेसाठी रक्त मिळवण्यात अडचणी आल्यामुळे, गेल्या ३-४ वर्षांपासून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यावर मी विचार करत होतो. मोबाईल फोनच्या वाढत्या उपयोगाचा वापर रक्तदात्यांपर्यंत पोचण्यासाठी कसा करता येईल या विचारातून मी व माझ्या मित्रांनी एक संकेतस्थळ तयार केले. माहितीच्या मायाजालास  मोबाईल SMS ची साथ देऊन आम्ही रक्तदात्यांपर्यंत पोचण्यासाठी केलेल्या संगणकप्रणालीला २०११ सालचा टेलीमेडिसीन सोसायटी ऑफ इंडिया चा पुरस्कार मिळाला. वर्तमानपत्रात आम्ही दिलेल्या निवेदनाला ५००० पेक्षा जास्त रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला आणि मोबाईल फोन चा वापर करून आमच्या संकेतस्थळावर नावनोंदणी केली.  परंतू पुण्यातील एकाही रक्तपेढीने या संगणकप्रणालीच्या वापरासाठी नाव नोंदवले नाही. 

आम्ही पुण्याच्या रक्तसंक्रमण संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप वाणी यांच्या सहाय्याने या संस्थेच्या संमेलनात सादरीकरण केले आणि रक्तपेढ्यांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. २४ रक्तपेढयांनी वर्षाला प्रत्येकी नाममात्र रुपये ५००० खर्च केल्यास पुण्यातील रक्ताचा तुटवडा कसा दूर करता येईल याचे सादरीकरण केले, परंतू रक्तपेढ्यांनी पैसे खर्च करण्यास असमर्थता व्यक्त केली. डॉ. वाणी यांनी संघटनेचे राष्टीय अध्यक्ष डॉ. युधबीर सिंग यांच्याकडे या प्रकल्पाला मदत मागण्यास सुचवले आणि त्यांनी ताबडतोब प्रतिसाद दिला. त्यांनी पुण्यात होणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनात मला सादरीकरण करण्यास सांगीतले आणि सादरीकरणाच्या शेवटी व्यासपीठावरून माझे कौतुक करून ताबडतोब माझी नियुक्ती संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर केली. त्यानंतर तीन वेळा दिल्ली येथे जाऊन मी कार्यकारिणीच्या निरनिराळ्या स्तरांवरील बैठकांमधे सादरीकरण केले.  १४ जून २०१२ रोजी या राष्ट्रीय प्रकल्पाची घोषणा झाली आणि पुणे, मुंबईच नव्हे तर कलकत्ता, मद्रास, हरियाणा मधून रक्तदात्यांनी या सूचीत आपले नाव नोंदवले. संपूर्ण भारतातून मिळालेल्या प्रतिसादामुळे शेवटच्या बैठकीत हा प्रकल्प राष्ट्रीय स्तरावर राबवण्यासाठी माझी नियुक्ती करण्यात आली आणि लागणारा सर्व खर्च संघटनेने करण्यास मान्यता दिली. या प्रकल्पाचा पहिला टप्पा पुणे येथे डॉ. वाणी यांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्याचे ठरले आणि त्यासाठी पुण्यामधील रक्तपेढ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली.


या बैठकीत पुण्यातील रक्तपेढ्यांनी आपल्याकडील रक्तदात्यांची नावे रक्तदात्यांच्या राष्ट्रीय सूचीत नोंदवण्यास साफ नकार दिला. त्यांच्या मते इतर रक्तपेढ्या या सूचीचा गैरवापर करु शकतील त्यामुळे प्रत्येक रक्तपेढीची सूची वेगवेगळीच ठेवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय संघटनेने प्रत्येक रक्तपेढी बरोबर एक करार करावा ज्यायोगे संगणक प्रणाली तयार करणे, माहिती साठा करणे, एस एम एस पाठवणे यासाठी लागणार्‍या खर्चाची जबाबदारी संघटनेने घ्यावी, पण रक्तपेढीची सूची फक्त त्याच रक्तपेढीला वापरता यावी. तसेच वर्तमान पत्रातून अथवा इतर माध्यमातून रक्तदातासूचीमधे नावनोंदणी करण्यासाठी संघटनेने  लोकांना आवाहन करावे आणि रक्तपेढीला गरज पडेल तेंव्हा संघटनेच्या या सूचीमधून रक्तदाता पुरवावा असे मुद्दे या करारात असावेत अशी चर्चा झाली. त्याप्रमाणे कराराचा एक मसुदा जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. कुलकर्णी यांनी तयार केला आणि तो राष्ट्रीय कार्यकारणीच्या अध्यक्षांना पाठवण्यात आला.

राष्ट्रीय कार्यकारिणीने असा कोणताही करार करण्यास विरोध केला, कारण गरज पडेल तेंव्हा रक्तदाता उपलब्ध होण्यासाठी तयार केलेल्या संगणक प्रणालीत; रक्तपेढ्यांनी सुचवलेल्या भिंती त्यांना मान्य नव्हत्या. तसेच खर्च संघटनेने करायचा आणि रक्तदात्यांवर रक्तपेढ्यांनी मालकी हक्क सांगायचा हे समीकरण कोणत्याही पदाधिकार्‍यांना मान्य नव्हते.
पुणे शहरातील रक्तपेढ्यांच्या, रक्तदात्यांवरील "हक्काच्या" भूमिकेमुळे पुणे शहर एका महत्वाकांक्षी प्रकल्पाला आणि रक्ताच्या तुटवड्यापासून मिळू शकणार्‍या मुक्तीला मुकले अश्या भावनेने मी या प्रकल्पातून अंग काढून घेतले.  यावरून रक्ताचा तुटवडा कृत्रीम असून रक्तपेढ्या त्यांच्या व्यवसायाकडे समाजसेवा म्हणून बघत नसून धंदा म्हणून बघत असल्याचे ध्यानात येते. 

No comments: